कैलास पर्वत कोणालाच सर करता आला नाही हे सत्य आहे का? असल्यास असे कोणी का करू शकले नसेल?
विज्ञान कितीही पुढे गेलं तरी अजूनही काही प्रश्नांना उत्तर शोधू शकलेलं नाही. कैलास पर्वताचा एकूणच आकार, त्याचं वातावरण तसेच तिथे येत असलेले अनुभव हे सध्या तरी एक रहस्य आहे. कैलास पर्वताचा उल्लेख अगदी वेदांमध्येही केला गेला आहे. त्यातही कैलास पर्वत हा पृथ्वीचा मध्य असल्याचं म्हंटल गेलं आहे. हे शिखर तिबेट इथल्या मिलारेपा ह्या बौद्ध भिक्षूने ९०० वर्षापूर्वी सर केल्याचं बोललं जातं. व त्यांनीही पुन्हा ह्यावर चढाई केली जाऊ नये असं बोलल्याची आख्यायिका आहे. १९८० ला चीन सरकारने प्रसिद्ध गिर्यारोहक राईनहोल्ड मिसनेर ज्यांनी जगातील ८००० मीटर ( २६,००० फुट) पेक्षा जास्ती उंचीची सगळी म्हणजे १४ शिखर सर केली आहेत त्यांना कैलास पर्वतावर आरोहण करण्यासाठी बोलावलं होतं. पण त्याने ते निमंत्रण नाकारलं होतं.
कैलास पर्वताला भेट देण्याचा प्रयत्न करणाऱ्या अनेकांना आपले केस व नख अचानक खूप वेगाने वाढण्याचा अनुभव आलेला आहे. असं म्हंटल जातं. अवघ्या १२ तासात केस आणि नख जितकी २ आठवड्यात वाढतात तितक्या वेगाने त्यांची वाढ नोंदवली गेली आहे. ह्या पर्वताच्या आजूबाजूला असणाऱ्या हवेमुळे इकडे अतिशय वेगात वय वाढते. यातील सत्यासत्तात जाणण्यासाठी आजवर बरेच जणांनी प्रयत्न केले.
२००१ साली चीन सरकारने एका स्वीडनच्या टीम ला ह्या पर्वतावर मोहीम आखण्यास परवानगी दिली होती. पण आंतरराष्ट्रीय स्तरावर कैलास पर्वताचं पावित्र्य लक्षात घेता त्या दबावाखाली चीन सरकारला अश्या मोहिमांवर कायस्वरूपी बंदी आणावी लागली.
असा हा पवित्र, अदभूत कैलास पर्वत आपल्या सोबत अनेक रहस्य घेऊन आजही हिमालयात उभा आहे. कैलास पर्वताजवळ दोन जलाशय आहेत. मानसरोवर आणि दुसरा राक्षसतळं. जगातील सर्वाधिक उंचीवरचं मानसरोवर हे १५०६० फूट उंचीवर ४१० चौरस किमी क्षेत्रफळ असलेलं, ९० मीटर खोल असलेलं हे सरोवर गोल आहे. ह्यातून ब्रह्मपुत्रा, इंडूस, घगहारा ह्या नद्यांचा उगम होतो. मानसरोवरचं पौराणिक महत्व खूप आहे. पण त्याच्या फक्त ३.७ किलोमीटर अंतरावर असलेलं राक्षसतळं मात्र ह्या पेक्षा पूर्णतः वेगळं आहे. राक्षसतळं हे रावणाने शंकराला प्रसन्न करताना बनवलं गेल्याची कथा आहे. त्यामुळे ह्याचं पाणी खारट आहे. ह्याच्या उत्तरेकडून सतलज नदीचा उगम होतो. दोन्ही जलाशय इतक्या जवळ असून पण ह्या दोन्ही तळ्यांच्या पाण्यात आणि जैवविविधतेत खूप वेगळेपणा आहे. राक्षसतळ्यात कोणत्याही जलचर आणि जल वनस्पतीचं अस्तित्व आढळून येत नाही. ह्याचे पाणी नेहमी अशांत असते. तर मानसरोवराच पाणी अतिशय शांत आहे. कितीही वारे वाहिले आणि हवेचा जोर असला तरी मानसरोवरा मधील पाणी नेहमीच शांत रहाते.
कैलास मानसरोवर यात्रा आजही अनेक खडतर यात्रांपेकी गणली जाते. ह्याचं कारण ह्याच्या आसपास न कोणता विमानतळ आहे, न रस्ते आहेत, न कोणतं बंदर आहे. इकडे जायचं असेल तर त्या निसर्गाला शरण जाऊन खडतर पायी प्रवास केल्यावरच ह्या अगम्य पर्वताचे दर्शन मानवाला होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा